नवीन माहिती

केंद्र आमठाणा,तालुका सिल्लोड,जिल्हा औरंगाबादच्या blog वर आपले स्वागत आहे .......

Pages

जोगेश्वरी देवी

जोगेश्वरी देवी

               पर्यटनाचा आनंद देणारे,जागृत देवस्थान,ऐतिहासिक महत्त्व लाभलेले,घाटनांद्राचे जोगेश्वरी मंदीर, शिलालेखदिपमाळपाण्याचे टाकेलेणीकरोडगिरी नाका,  सभामंडपआई जगदंबेचे दर्शन सर्व काही…………       
                                खान्देश आणि मराठवाडयाच्या सरहद्दीवर घाटनांद्रा,ता.सिल्लोड पासुन उत्तरेला चार किलोमिटर अंतरावर निसर्गरम्य अजिंठ्याच्या डोंगररांगा पसरलेल्या आहेत. या प्रत्येक डोंगरात ऐतिहासिक दृष्ट्या, समृद्ध तसेच अध्यात्त्मिक वारसा सांगणारे अनेक प्रेक्षणिय स्थळे वसलेली आहेत याच डोंगरातच्या कुशित आईच्या भक्तांना दर्शनासोबतच पर्यटनाचाही आनंद देणारे,संपूर्ण दगडामध्ये, वैशिष्ट्यपूर्ण कोरीव असे "जोगेश्वरी देवीच" जागृत मंदीर वसलेले  आहे.                                         
सिल्लोड तालुक्याचे कुलदैवत असणारे हे मंदीर तुळजापूरच्या देवीचे उपपीठ असून अजिंठा , वेरूळ लेणीच्या समकालीन असल्याचा उल्लेख राज्य पुरातत्व विभागाच्या नोंदीमध्ये आढळतो.  
                                                   
 कसे जाल ?       
बस मार्ग :- औरंगाबाद - सिल्लोड-घाटनांद्रा -जोगेश्वरी -100 किलोमिटर                      जळगांव -पाचोरा-तिडका-घाटनांद्रा - जोगेश्वरी - 98 किलोमिटर 
               जळवचे रेल्वेस्टेशन पाचोरा असून येथून मुंबई कडे तसेच नागपूरकडे जाणाऱ्या रेल्वे उपलब्ध आहेत.  पावसाळ्यामध्ये या स्थळी भेट दिल्यास जणु स्वर्गात असल्याचा आभास होतो. उंचावरून खान्देशचा परिसर न्याहाळतांना मन प्रफुल्लित होते.

जोगेश्वरी मंदीर :-      डोंगराच्या ऐन मध्यावर असणाऱ्या या मंदिरात जाण्यासाठी घाटनांद्राहून जातांना अर्धा डोंगर उतराव लागतो, तर खान्देशकडून येणाऱ्यांना चढावा लागतो.यासाठी पायऱ्यांची व्यवस्था आहे.                                   
              मंदिराच्या प्रांगणात दिमाखदारापणे उभी असलेली दीपमाळ या मंदीराच्या प्राचीनतेची साक्ष देते. पुढे गेल्या नंतर मुख्य  मंदिराचे दर्शन होते .व्दिताली  असणाऱ्या या मंदिराच्या खालच्या भागात पूर्ण पाणी तर वरच्या भागात देवीची मुर्ती व संभामंडप आहे. मंदिराचा हा सभामंडप 40 X 20 चा कोरीव स्वरूपाचा आहे. दिपमाळेच्या उजव्या बाजूला आणि सभामंडपाच्या अगदी समोर पाण्याचे टाके आहे.यातील पाणी अतिशय थंड असून हे कधी आटत नाही. हे पाणी पिल्यांनंतर डोंगर उतरण्याचा चढण्याचा शीण नाहीसा होतो. समोरच मंदिराचा मुख्य गाभारा आहे. प्रवेशव्दारावर बाहेरून दोन्ही बाजूंना सुमारे सात फुट उंचीच्या देवतांच्या मुर्ती आहेत. प्रवेशासाठीचा मुख्य दरवाजा हा उंचीला कमीत कमी असल्यामुळे आपोआपच नतमस्तक होउुन आत जावे लागते.

जोगेश्वरी देवी :-  आत प्रवेश केल्यानंतर समोरच वाघावर आरूढ झालेली जोगेश्वरी देवीची साडेसहा फुट उंचीची अष्टभूजा मुर्ती आहे. तिच्या प्रत्येक हातात खडग असून ती संपूर्ण दगडामध्ये कोरीव आहे. तुळजापुरचे उपपीठ असणारी जोगेश्वरी माता भक्तांची संकटे दूर करून मनोकामना पूर्ण करते असा भक्तांचा विश्वास आहे. हे अत्यंत जागृत असे नवसाला पावणारे देवस्थान मानले जाते. जोगेश्वरी मंदिराच्या सभामंडप दगडी खांबांवर उभा असून या ठिकाणी दगडी भिंतींमध्ये अजिंठा लेणीप्रमाणे देवी, देवतांच्या रेखीव मुर्ती आहेत.

शिलालेख :-          40X 20 च्या कोरीव सभामंडपाच्या बाह्य बाजूला, पाण्याच्या टाक्याच्या वरच्या बाजूला अंदाजे 5x2 फुट लांबीचा एक शिलालेख दगडामध्ये कोरलेला आहे.हा शिलालेख मोडीसदृष्य पाली भाषेततील असल्याचा दावा इतिहास अभ्यासक प्रा.भेंडेकर सर यांनी  सांगितले डोंगरावरचे  झिरपणारे पाणी या  शिलालेखावरून जात असल्याने हा महत्तवाचा शिलालेख नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.याचे शास्त्रिय रित्या वाचन झाल्यास या मंदिरासंदर्भातिल अनेक प्रश्नांची उत्तरे मिळू शकतील. हे महत्त्त्वाचे ऐतिहासिक साधन जतन करून त्यांचे संवर्धन करणे आवश्यक आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी इतिहास अभ्यासकांसाठी हे विशेष आकर्षण आहे. शालेय उपक्रमातील निसर्ग सहल आणि ऐतिहासिक स्थळांना भेटीसाठी जोगेश्वरी मंदिर हे महत्त्वाचे स्थान ठरते.

करोडगिरी नाका :-  निजामकाळात मराठवाडा व खान्देश यांना जोडणारा रस्ता याच डोंगरातून जात असल्याने मंदिराच्या वर तत्कालीन करोडगिरी नाक्याचे भग्न अवशेष आजही दिसतात. निजाम राजवटीत घाटनांद्रा हे मोठे व्यापारकेंद्र तसेच तालुक्याचे ठिकाण होते. या करोडगिरी नाक्यावर जकात वसुली होत असल्याचे येथिल वृद्ध आजही सांगतात.
                          या मंदिराच्या डाव्या बाजुला एक मोठी गुहा आहे. या ठिकाणी लेणी कोरण्याचा प्रयत्न केला गेला.मात्र कच्या दगड लागल्याने हे काम सोडावे लागले असावे. सध्या याचा उपयोग भाविक स्वयंपाकघर म्हणून करतात. म्हणून या गुहेला "घोडतबेला" असे ही म्हणतात. ही गुहा अर्धवट लेणीसदृष्य असून पावसाळ्यामध्ये या गुहेचा भाविक उपयोग करतात.    
                         
यात्रा महोत्सव :-      नवरात्र काळात येथे मोठी यात्रा भरते . खान्देश, गुजरात,मध्य प्रदेश ,इत्यादी ठिकाणांहून भाविक दर्शनाला येतात.पुणे,मुंबई ,नाशिक येथिल भाविकांचे हे कुलदैवत असुन त्यांच्या सहकाऱ्याने येथे मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली आहेत.डोंगर उतरण्यासाठी पायऱ्या , मंदिर परिसरात निवास खोल्या तसेच एक भव्य सभागृह तथा मंगल कार्यालय बांधण्यात आलेले आहे.



 *************धन्यवाद ! ***********
मार्गदर्शन व विषेश सहकार्य
श्री कुंभारे सर (केंद्राप्रमुख आमठाणा)
9423981431
माहिती संकलन कर्ता
श्री जोशी सर